Saturday, July 5, 2014

जंजिऱ्याचे सिद्दी

जंजिऱ्याचे सिद्दी
- सु. र. देशपांडे

रायगड जिल्ह्यातील जंजिरा या भूतपूर्व संस्थानचे राज्यकर्ते-नबाब. पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस सु. ०·५ किमी.वर एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे. परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत त्याचा सिगेरस किंवा झिगेरस बंदर असाही उल्लेख आढळतो. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख येतो. ते ॲबिसियन किंवा अबिशियन शब्दाचे अपभ्रंश रुप असावे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीत कालोल्लेखाचा कोरीव लेख आहे. कोटाच्या तटाला दोन किंवा तीन मजली २७ मीटरच्या अंतराने बांधलेले २२ बुरुज आहेत. त्यांतून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारुगोळा ठेवण्याची सोय होती. तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. जवळच सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा हे पर्यटकांचे आकर्षण होय. विदेशी तोफांत तीन स्वीडनच्या आणि स्पेन, नेदर्लंड्स (हॉलंड) व फ्रान्स यांची प्रत्येकी एक तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्य राहिलेला आहे. पंधराव्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले. अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जात. त्यांना सौदी असेही म्हणत. सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आणले; तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्घ झाले. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ हैदराबाद (दक्षिण) या संस्थेने सिद्दी जमातीचा सर्वंकष अभ्यास व संशोधन करुन ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत काही निष्कर्ष काढले आहेत (२०११).

जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारुंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला होता. बहमनी सुलतानांच्या कारकीर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला; पण यश मिळाले नाही. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९० मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. किल्ल्याची डागडुजी करुन याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला. दुसऱ्या एका प्रवासवर्णनातील वृत्तांतानुसार (क्लूनची इटिनेररी) पेरिमखान नावाच्या सिद्दीने कोळ्यांना फसवून जंजीरा हस्तगत केला, असा उल्लेख मिळतो. पेरिमखान बारा वर्षे जंजिऱ्यावर होता आणि १५३८ मध्ये मरण पावला. लारकोमच्या माहितीनुसार अहमदनगरच्या बुऱ्हान निजामशहाने (१५०९— ५३) जंजिरा व दंडा-राजपुरीचा सुभा त्याचा इराणी शिया मंत्री शाह ताहिर याच्याकडे सोपविला; तथापि पेरिमखानानंतर आलेल्या बुऱ्हान या आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान हा बुलंद किल्ला बांधला असा उल्लेख मिळतो. त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले; मात्र तेथील उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे. पुढे १६०० मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने (१५४९— १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला. १६१८ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून जंजिऱ्याच्या नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२० मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१ मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला. त्याबरोबर सिद्दी अंबर विजापूरचा ताबेदार झाला. यावेळी जंजिरा संस्थानच्या सीमा वाढल्या होत्या. पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत ते विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना होऊ लागला. जंजिऱ्याच्या सिद्दी प्रमुखास आदिलशहाने वझीर किताब दिला. वझीर सिद्दी अंबर १६४६ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर झाला. यापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. म्हणून १६७० मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास खुष्कीच्या मार्गाने तसेच समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगीजांनी सिद्दीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला; तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला. तेव्हा सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करुन फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारुन मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे मे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही महाराजांना यश लाभले नाही. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करुन जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६ मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) छत्रपती संभाजींनी जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला (१६८२); पण त्यांनाही ते जमले नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. १६९४ ते ९८ पर्यंत कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे त्याने सर्व किल्ले परत घेतले गेले. कान्होजीच्या मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजींच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिद्दीने बळकावलेला मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते. सिद्दी आणि पोर्तुगीजांनी आंग्रेच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला; परंतु कान्होजीने या त्रयींचा पराभव केला. औरंगजेबाने सिद्दीने केलेल्या मदतीपोटी त्याला मराठ्यांची कोकणातील सर्व ठाणी दिली. मराठ्यांचे रायगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्गासह अनेक किल्ले त्याच्या ताब्यात आले होते. सिद्दी घराण्यातील सिद्दी सात हा गोवलकोट व अंजनवेल किल्ल्यांवर मुख्य प्रशासक होता. महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत रामचंद्रपंतांनी सिद्दीवर हल्ला केला (१७०१); परंतु यश आले नाही.

सिद्दी कासिम मरण पावल्यावर (१७०७) पद्मदुर्गाचा किल्लेदार सिरुरखान त्याच्या जागी आला. त्याच्या मृत्यूनंतर (१७३४) सिद्दी रेहमान जंजिऱ्याचा नबाब झाला. १७३९ मध्ये हुसेनने त्यास पदच्युत करुन नबाबी मिळविली. तत्पूर्वी सिद्दी सात या शूर, मर्द व राजकारणी सेनापतीचा चिमाजी आप्पांनी पराभव करुन त्यास रेवासजवळ चरईच्या लढाईत ठार केले. त्याच्या सोबतच्या या लढाईत (१७३६) देवकोंड नाईक, सुभानजी घाटगा, फाईम, बाळाजी शेणवी वगैरे जंजिऱ्याचे मातब्बर सरदारही मारले गेले. हुसेन सिद्दीनंतर (१७४५) सय्यद अल्लाना गादीवर आला; पण त्यास सिद्दी इब्राहिमने पदच्युत करुन (१७४६) गादी बळकाविली.

मिया आचन सिद्दी १७४८ मध्ये जंजिऱ्याचा प्रशासक बनला. पुढे १७५१ मध्ये सिद्दी मसूदने त्यास घालविले. मसूद वारल्यानंतर (१७५६) बरेच सिद्दी बदलले. मराठ्यांविरुद्घ इंग्रज सतत सिद्दीस मदत करीत, तसेच गोव्याचे पोर्तुगीजही, त्यांना दारुगोळा व शस्त्रसामग्री पुरवीत असत. तथापि या दोन्ही परकीय सत्तांना जंजिऱ्यावर वर्चस्व मिळविता आले नाही. सिद्दी घराण्यात गादीवरुन अंतःकलह चालू झाले. त्याचा फायदा नाना फडणीसांनी १७९१ मध्ये घेऊन सिद्दी गादीचा एक हक्कदार बालूमिया याला सुरतेजवळची सचिनची जहागीर देवविली व जंजिऱ्याचा करार केला; पण पेशवे प्रत्यक्ष जंजिऱ्याचा ताबा मिळवू शकले नाहीत. त्या वेळचा जंजिऱ्याचा नबाब सिद्दी जोहर इंग्रजांना शरण गेला. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) इंग्रजांनी जंजिऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन १८३४ मध्ये त्यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली. सिद्दी मुहम्मद याने १८४८ मध्ये राज्यत्याग करुन सिद्दी इब्राहिम या मुलास गादीवर बसविले. १८६७ मध्ये जंजिऱ्याचा नबाब व तेथील सरदार यांत तीव्र मतभेद निर्माण झाले. इंग्रजांनी तेथील नबाबाला पदच्युत करुन (१८६९) तिथे इंग्रज रेसिडेंट नेला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला. तेव्हा त्याचे पद चालू ठेवले, पण अधिकार कमी केले. सिद्दी इब्राहिम खान १८७९ मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी (पहिले दोन अनौरस व धाकटा औरस) धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या मुलास इंग्रजांनी गादीवर बसविले. त्याने राजकोट-पुण्याला शिक्षण घेऊन सज्ञान झाल्यावर त्याच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला. त्याने संस्थानात शाळा काढली. मुरुडचे जंगल तोडून रस्ते केले. १८९२ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स ही योजना राबविली. शिवाय नगरपालिका आणि लोकल बोर्डाची स्थापना करुन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या त्याच्या कार्याविषयी ब्रिटिशांनी त्यास के. सी. आय्. ई. हे बिरुद बहाल केले. त्यास ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर (१९४७) जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४८) व ते मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

सिद्दी लोक पराक्रमी, लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी होते. मलिक अंबर, मलिक काफूर, मलिक याकुब, फतेहखान, सिद्दी संबळ, याकुबखान, सिद्दी कासीम, सिद्दी मसूद, सिद्दी सात, सिद्दी खान, सिद्दी सुभान इ. अनेक सरदार हुशार, बुद्घिमान आणि लढवय्ये म्हणून विख्यात होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता.

पहा : जंजिरा संस्थान.

संदर्भ :
१. केळकर, य. न. इतिहासातील सहली, पुणे, १९५१.
२. देवळे, श. रा. महाराष्ट्रातील किल्ले, पुणे, १९८१.
३. पुरोहित, श्री. रा. किल्ले जंजिरा, भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्रैमासिक, १ एप्रिल १९६९, मुंबई.
४. बेंद्रे, वा. सी. जंजिरेकर सिदी; शिवाजी निबंधावली, भाग २, पुणे, १९३४.
५. भोसले, बा. के. जंजिरा संस्थानचा इतिहास, बडोदे, १८९८.
६. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत (सुधारित आवृत्ती), खंड १ ते ३, मुंबई, १९८८ व १९८९.

http://marathivishwakosh.in/khandas/khand19/index.php?option=com_content&view=article&id=10404

Thursday, June 26, 2014

Battle of Satavli - सातवलीची लढाई

१६७१ पासून सिद्दीने घेतलेला आक्रमक पवित्रा वाढतच चालला होता. दंडाराजपुरीच्या विजयानंतर खुद्द आलमगीर-औरंगजेबाने सिद्दीच्या डोक्यावर हात ठेवला होता. सिद्दी संबूल हा मुघलांचा आरमारी सुभेदार झाला. म्हणजेच अमीर अल बहऱ्र.

त्याने दाभोळ आणि नागोठणे सारखी संपन्न शहरे बेचिराख केली. तर केळशी येथील मराठ्यांच्या आरमाराची एक संपूर्ण तुकडीच जाळून राख केली.

आलमगीराचे द्रव्य आणि सिद्दींचा आरमारी हुन्नर, या संयुक्त बळापुढे नवख्या मऱ्हाटी आरमाराचे काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता.

आता सगळं काही एका निर्णायक लढाईच्या निकालावर अवलंबून होते.

त्यात सन १६७४ उजाडले. महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय केला होता. पण जंजिरा हा रायगडापासून एका मजलीच्या अंतरावर होते. त्यामुळे सिद्दीचा धोका दूर करणे महत्वाचे होते.

महाराजांनी नेमके काय केले हे इतिहास सांगत नाही. पण मार्च १६७४ मध्ये इतिहासाची दिशा काही अशाप्रकारे बदलली.

मुचकुंदीच्या खाडीत (आजच्या पूर्णगड किल्ल्या समोर), आणि सातवली नावाच्या छोट्या कसब्याजवळ, सिद्दी संबूल आणि दौलतखान यांची दर्या गाजवणारी लढाई झाली.

दोन्ही बाजूंनी पराक्रमाची शर्थ झाली. सिद्दी संबूल आणि दौलतखान जातीने आपल्या आरमाराचे नेतृत्व करत होते. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून दोन्ही आरमार हातात तलवारी घेऊन भिडले.

मराठ्यांची ४४ माणसे कामी आली. तर खुद्द दौलतखानाच्या पायाला बाण लागून तो जखमी झाला.
पण सिद्दीचा दारूण पराभव झाला.
सिद्दी कडील १०० माणसे मेली, तर सिद्दी संबूलच्याच गलबताला आग लागली. यात त्याचे दोन्ही हात भाजले.

संबूलने इथून जो पळ काढला तो थेट हरीहरेश्वरला पोहोचल्यावरचं थांबला.

एकाप्रकारे दौलतखानाने महाराजांना राज्याभिषेकासाठी दिलेला नजराणाच हा.

या लढाईमुळे मराठ्यांना राजापूर ते बारदेश हा पूर्ण तळकोंकण प्रांत, सिद्दीची चिंता न करता, जिंकता आला.

राज्याभिषेकाला त्रास देणे सोडाच, उलट सिद्दीने परत आलमगीरकडे कुमक पाठवण्याची केविलवाणी विनंती सुरु केली. आणि चक्क सप्टेंबर १६७५ पर्यंत, म्हणजे दीड वर्ष, कोणत्याही प्रकारे मराठ्यांच्या नादी लागला नाही.

Sunday, June 1, 2014

आंग्रे घराणे

आंग्रे घराणे
- सु. र. देशपांडे.

मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजींनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, तीत प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते शिवाजीच्या पदरी गेले. त्यांस मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. १६८०त तुकोजींचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी  ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वांत कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत.

छत्रपती संभाजींच्या वधानंतर छत्रपती राजाराम ह्यांस जिंजी येथे जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. १६९४–१७०४च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मोगलाकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी  “आपण कोकणकिनाऱ्याचे राजे” अशी घोषणा केली. छत्रपती राजाराम ह्यांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठी आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांस राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला. पुढे १७०७ मध्ये छत्रपती शाहू  हे मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल ताराबाई व शाहू ह्या उभयतांत वाद निर्माण झाला. पण अखेर शाहूंची सरशी होऊन सातारची छत्रपतींची गादी शाहूंस मिळाली. नंतर शाहूंनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले. परंतु त्याचा काही उपयोग न होता तो कान्होजींच्या कैदेत मात्र पडला. तेव्हा शाहूंनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजीविश्वनाथह्या आपल्या पेशव्यास त्यांविरुद्ध धाडले. बाळाजींने कान्होजींबरोबर तह करून त्यांस शाहूंच्या पक्षात सामील करून घेतले आणि त्यांस काही मुलुख, सरखेलपद आणि मराठी आरमाराचे आधिपत्य शाहूंकडून देवविले. ते अखेरपर्यंत, म्हणजे १७२९ पर्यंत शाहूंच्या पक्षात होते.

कान्होजींनी  मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोणपपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजींची जहाजे त्रावणकोर-कोचीनपासून उत्तरेस सुरत-कच्छपर्यंत निर्वेधपणे समुद्रातून संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीधंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी मराठेतर जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला.

कान्होजींस सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी व धोंडजी असे सहा पुत्र झाले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे सरखेल (१७२९–३४) झाले. ह्या वेळी सिद्दीसाताने ब्रह्मेंद्रस्वामींचे परशुरामक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा सिद्द्याचे पारिपत्य करण्यासाठी पहिले बाजीराव कोकणात उतरले. त्यास सेखोजींनी मदत केली. त्यांनी पेशवे व छत्रपत्ती ह्या दोघांशी सलोखा ठेवून आरमाराची वृद्धी केली. पण ते १७३३ मध्ये निधन पावल्यावर आंग्रे घराण्यात अंत:स्थ कलह सुरू झाला. संभाजी व मानाजी या भावांत सरखेलीबद्दल वितुष्ट निर्माण होऊन त्याचा परिणाम साहजिकच सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींवरील मराठ्यांचा वचक कमी होण्यात झाला. दोघेही आपले स्वार्थ व सत्ता वाढविण्याच्या मागे लागले. त्यामुळे परस्परांविरुद्ध दोघेही परकीयांची मदत घेऊ लागले. म्हणून पहिले बाजीराव ह्यांनी ह्या भांडणात मध्यस्थी करून १७३५ मध्ये संभाजींस सरखेल हा किताब व सुवर्णदुर्ग आणि मानाजींस वजारत-म्-आब हा किताब व कुलाबा देऊन दोघांना खूष करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र त्यामुळे मराठी आरमारात दोन सत्ताधारी निर्माण झाले. संभाजी १७४२ मध्ये मरण पावले. त्यांस मुलगा नसल्यामुळे त्यांचा दुसरा सावत्र भाऊ तुळाजी सुवर्णदुर्गाचे अधिपती (१७४२–५६) झाले. त्यांच्या आरमारात ७४ तोफांचा गुराब, २० ते ३० टनी ८ गुराब व ६० गलबते होती. त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांची अनेक जहाजे पकडली व त्यांना आपले परवाने (दस्तक) घ्यावयास भाग पाडले. सिद्दीचे अजिंक्य समजले जाणारे गोवळकोट व अंजनवेल किल्ले जिंकले व सर्वत्र दरारा निर्माण केला, पण त्यांचे पेशव्यांशी कधीच पटले नाही. त्यांनी प्रतिनिधी, अमात्य, सावंतवाडीकर, कोल्हापूरकर इत्यादींच्या प्रदेशावर अनेक वेळा आक्रमणे केली, शिवाय पेशव्यांविरुद्ध ताराबाईंशी संधान बांधले. तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १७५६ मध्ये त्यांवर विजयदुर्ग इथे चढाई केली. तीत तुळाजींचा पराभव होऊन पेशव्यांनी त्यांस कैद केले; आणि इंग्रजांनी सदर चढाईत तुळाजींचे आरमार जाळले. ह्यामुळे मराठी आरमार पुढे कायमचे खच्ची झाले. तेव्हा पेशव्यांनी स्वतचे आरमार उभे केले. कान्होजींनंतर तुळाजींइतका पराक्रमी पुरुष आंग्रे घराण्यात पुढे झाला नाही.

ह्यापूर्वी व ह्या सुमारास मानाजी आंग्रे मात्र पेशव्यांस सर्वतोपरी मदत करीत होते. त्यांनी १७३७–३९च्या मराठे-पोर्तुगीज युद्धात पोर्तुगीजांची समुद्रात नाकेबंदी करून त्यांना जेरीस आणले; आणि पुढे १७४० मध्ये तर मानाजींनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. सिद्दीविरुद्धच्या मराठ्यांच्या लढाईत मानाजींनी पेशव्यांस साहाय्य केले. १७५५ मधील उंदेरीच्या मोहिमेत पेशव्यांच्या मदतीला मानाजी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन सिद्दींचा सरदार आबाजी घाटगे ह्याने आंग्र्यांच्या मुलुखावर स्वारी केली. त्यामुळे मानाजी तातडीने कुलाब्यास आले आणि सिद्द्यांची कायमची खोड मोडण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघोजी यांनी हे कार्य पुढे तडीस नेले. मानाजींनी  आपल्या मनमिळाऊ व साहाय्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे छत्रपती व पेशवे ह्या दोघांकडे आपले चांगलेच वजन निर्माण केले होते. ते १७५९ मध्ये मरण पावले.

तुळाजी व मानाजी ह्यांच्या नंतर रघोजी हा मानाजींचा ज्येष्ठ पुत्र सरखेलपदावर आला (१७५९–९३). ह्या सुमारास अलिबागच्या उत्तरेकडील पूर्वपश्चिमपट्टी आंग्रे व पेशवे ह्यांच्या संयुक्त अंमलाखाली होती. फक्त जंजिरकर सिद्दी यांचा उंदेरीचा भाग त्यात समाविष्ट नव्हता. सिद्दीच्या उंदेरी येथे झालेल्या संपूर्ण पराभवानंतर तो पेशव्यांनी घेतला आणि त्यास ‘जयदुर्ग’असे नाव देऊन तिथे आपला अंमलदार नेमला. ही एवढी घटना सोडता रघोजींची उर्वरित कारकीर्द शांततेची गेली. मात्र इथून पुढे आंग्रे हे केवळ एक नामधारी सरदार राहिले.

दुसरे मानाजी हे रघोजींचे ज्येष्ठ पुत्र रघोजींच्या मृत्यूनंतर सरखेल झाले (१७९३–९९). अल्पवयीन असल्यामुळे त्या वेळी त्यांचा सावत्र भाऊ जयसिंगराव ह्यांना पेशव्यांनी कुलमुखत्यार म्हणून नेमले. अर्थात ही गोष्ट मानाजींची आई आनंदीबाई ह्यांना खपली नाही. त्यांनी जयसिंगरावांस मारण्याचा कट रचिला. साहजिकच उभयतांत यादवीस सुरुवात झाली. पुणे दरबारने एकंदरीत सर्व राजकीय परिस्थिती पाहून मानाजी ह्यांना साहाय्य करण्याचे ठरविले. तेव्हा जयसिंगरावांनी आलीजाह बहादुर शिंदे लष्करकर यांच्याकडे मदतीची याचना केली. शिंद्यांकडून जयसिंगरावास मानाजी व पेशवे ह्यांच्या विरुद्ध मदत म्हणून पहिले कान्होजी यांचा नातू (येसजीचा मुलगा) बाबुराव ह्यांना पाठविण्यात आले. प्रथम बाबुरावांनी जयसिंगरावांना मदत केली परंतु कुलाबासंस्थानची तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेऊन जयसिंगराव व मानाजी ह्या दोघांस बाजूस सारून बाबुराव आपणच सरखेलपदी चढले (१७९९–१८१३). दरम्यान पेशवाई खिळखिळी होऊन अंत:स्थ कलहाला सुरुवात झाली होती. बाबुरावांच्या कारकिर्दीत सकवारबाई (जयसिंगरावांची पत्‍नी) हिचे बंड सोडले, तर इतर सर्व कारकीर्द गेली. त्यांनी अनेक लोककल्याणाची कामे केली व संस्थानातील दंगेधोपे शमविले. बाबुराव जामगाव (अहमदनगर) मुक्कामी मरण पावले. नंतर विनायक परशुराम ह्या दिवाणजींच्या मध्यस्थीने दुसरे मानाजी पुन्हा सरखेलपदी आले (१८१३–१७). पण पुढे मानाजी व दिवाणजी यांच्यात वितुष्ट आले. लवकरच दुसरे मानाजी निधन पावले. त्यांच्यानंतर दुसरे रघोजी ह्या मानाजींच्या मुलास सरखेलीची वस्त्रे दुसरे बाजीराव पेशवे यांजकडून मिळाली (१८१७–३८). हा काल मराठी सत्तेच्या धामधुमीचा व अवनतीचा होता. तथापि रघोजींनी अत्यंत शांततेने संस्थानचा कारभार केला व संस्थानची आबादानी केली. १८२२च्या इंग्रजांबरोबरच्या तहामुळे रघोजींवर अनेक निर्बंध आले. ते १८३८ मध्ये कुलाबा येथे निधन पावले. त्यांना दोन मुलगे होते. त्यांपैकी एक रघोजींच्या अगोदर मृत्यू पावला व दुसरा रघोजींच्या मृत्यूनंतर जन्मास आला. त्यांचे नाव ‘कान्होजी’असे ठेवण्यात आले, परंतु ते अल्पवयीनच १८३९ मध्ये मरण पावले. त्यामुळे कंपनी सरकारने कुलाबा संस्थानाची जप्ती केली. १८३९–४४ ह्या अवधीत राण्यांनी दत्तक घेण्याबाबत खटपट चालविली होती, पण कंपनी सरकारने मयत दुसरे कान्होजी आंग्रे ह्यांस वारस नाही म्हणून १८४४ मध्ये कुलाबा संस्थान खालसा केले, आणि डेव्हिस ह्या इंग्रजी अधिकाऱ्यास दिवाण विनायक परशुराम ह्यांजकडून संस्थानच्या सर्व मालमत्तेचा ताबा घेण्यास फर्माविले.

कुलाबकर सरखेल आंग्रे यांची एक शाखा मूळ संस्थापक कान्होजी यांचे चिरंजीव येसजी यांच्या वेळेपासून ग्वाल्हेरास आहे. येसजींची मुलगी मैनाबाई ही त्या वेळी शिंदे घराण्यात दिली होती. हे शिंदे पुढे ग्वाल्हेरात संस्थानाचे अधिपती झाली. त्या वेळी सरखेलपद मिळण्याची संधी आपणास नाही असे पाहून येसजींचे मुलगे मावजी व बाबुराव हे बहिणीकडे जाऊन राहिले. बाबुरावांनी आपल्या सेनेसह शिंदे ह्यांना अनेक लढायांत मदत केली म्हणून आंग्र्यांना भोरासा, नेओरी आणि पानविहार हे भाग जहागीर म्हणून मिळाले. शिवाय सर्व लवाजमा व ‘वजारत-माब-सरखेल’ ह्या किताबात ‘सवाई’ हा आणखी एक किताब बहाल करण्यात आला. बाबुरावांस संतती नसल्यामुळे त्यांनी मावजी ह्या आपल्या भावाचा संभाजी हा मुलगा दत्तक घेतला व ते अलिबागेस परतले. ह्या वेळी माळव्यात अनेक उचापती व लूटमार चालू होती. ती संभाजींनी थांबवून ग्वाल्हेर संस्थानास हरएक प्रकारे मदत केली. म्हणून शिंद्यांनी आणखी काही मुलूख त्यांस दिला. संभाजींसही मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा अप्पासाहेब (बाबुराव) हा १८३९ मध्ये दत्तक घेतला. संभाजी १८४६ मध्ये मरण पावले. बाबुरावांनी संस्थानात अनेक हुद्द्यांच्या जागांवर काम केले. त्यांनाही मुलगा नसल्यामुळे त्यांनी अलिबागकर आंग्रे घराण्यातील ‘त्र्यबकराव’ नावाचा मुलगा दत्तक घेण्याचे ठरविले, तथापि ते १८९१ मध्ये दत्तक घेण्यापूर्वी मृत्यू पावले. तेव्हा त्यांनी ठरविलेला दत्तक पुढे १८९२ साली घेण्यात येऊन त्याचे नाव ‘संभाजी ’ ठेवण्यात आले. त्यांना १८९६ मध्ये मुलगा झाला. हे चंद्रोजीराव व त्यांचे चिरंजीव संभाजीराव सध्या विद्यमान असून चंद्रोजीराव हे विद्वान, अभ्यासू व समाजकार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्थानिकांच्या राजकारणात त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.

संदर्भ : 1. Burrows, C. B., Pub. Representative Men of Central India, Bombay, 1902.
            2. Sen, S. N. The Military System of the Marathas, Calcutta, 1958.
            ३. ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल,  अलिबाग, १९३९.

Friday, May 30, 2014

भारतीय नौसेना १९४७ पर्यंत

तेराव्या शतकापासून ते इ. स.१९४७ पर्यंत भारताने नौसेनाक्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले नाही. याची कारणे म्हणजे दीर्घकालीन पारतंत्र्य व जमिनीवर होणाऱ्या लढाया ही होत. आठव्या शतकापासून ते सतराव्या शतकाअखेरपर्यंत हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गाने परकीय आक्रमणे झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पाश्चात्त्यांनी सागरामार्गे व्यापारी आक्रमणे करून शेवटी इंग्रजांनी हिंदुस्थानावर राज्य स्थापले. इ. स. पू. सु. सोळाव्या शतकापूर्वी म्हणजे आर्यांच्या आक्रमणापूर्वी सिंधू संस्कृतीचा सुमेर, अक्कड इत्यादींबरोबर सागरी व्यापार चाले. हा व्यापार निर्विघ्नपणे चालत असण्याचा संभव नाही; परंतु तत्कालीन नौसेना कशा असाव्यात, हे मात्र सांगता येत नाही. पुरातत्त्व उत्खननात सापडलेल्या मुद्रा व भांड्यांवरील नौकांच्या चित्रांवरून त्या काळी शिडांची जहाजे होती हे कळते. रामायणामध्ये (अयोध्याकांड ९५) नदीत लढणाऱ्या नौका व सेना यांचा उल्लेख आहे. महाभारतात नौसेना हे एक सेनांग आहे. ऋग्वेदामध्ये (मंडल १, ७ व १०) नौकांचे उल्लेख आहेत; परंतु त्यांचे स्वरूप कळत नाही. पुराण, जातक इ. वाङ्‌मयात नौका, सागरी व्यापार इत्यादींची वर्णने आहेत.

अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष (२·२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे; तथापि चाणक्याने नौसेनेचा उल्लेख केलेला नाही. पुराणांत व जातकादी वाङ्‌मयात नौका, नौकाबांधणी व पर्यटन यांचे उल्लेख आहेत. गुप्त, कलिंग, हर्ष, यादव, कदंब व शिलाहार इत्यादींच्या नौसेना असाव्यात. चौलांनी नाविक बळाचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कंबोज या देशांत साम्राज्यविस्तार केला होता. अकबराच्या आइन-इ-अकबरीत मोगली नौसेनेची माहिती मिळते.

नौकाबांधणीबद्दल युक्तिकल्पतरु या मध्ययुगीन ग्रंथात माहिती मिळते. ज्या नौकांच्या लांबी-उंचीचे प्रमाण १० : १ व रुंदी-उंचीचे प्रमाण १·२५ : १ असते, त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २ : १ व १ : १ असते, त्या संकट आणतात; असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत नौशिल्पकल्पना अवास्तव वाटतात. संस्कृत ग्रंथ घटक-कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेबकालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथांत नौकांविषयी पुष्कळ वर्णने आहेत.

स्वतंत्र भारताच्या व पाकिस्तानच्या नौसेनांचे मूळ, १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापिलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’ (इंडियन मरीन) या नौदलात सापडते. अरबी समुद्रात चाचेगिरी चाले. या चाच्यांशी मुकाबला करता यावा म्हणून ५ सप्टेंबर १६१२ रोजी दोन शस्त्रास्त्रयुक्त व्यापारी जहाजे ब्रिटिशांच्या सुरत वखारीत दाखल झाली; हीच इंडियन मरीनची सुरुवात होय. इंडियन मरीनमध्ये गुरब व गलबते (सु. ७५ ते ३०० टनभाराची) पुढे आली. त्यात हिंदू कोळ्यांची नौसैनिक म्हणून भरती केली जाई. खंबायतचे आखात, तापी व नर्मदा यांच्या मुखाजवळील सागरीक्षेत्राचे रक्षण हे काम मरीनकडे होते. सुरत, अहमदाबाद आणि खंबायत येथे नाविक प्रशिक्षण दिले जाई. १६१५ पर्यंत १० गुरब आणि गलबते काम करीत. १६२२ मध्ये इराणी आखातातील ओर्मुझ बंदर ‘मरीन’ ने ताब्यात घेऊन चाचेगिरीला बराच आळा घातला. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराशी इंडियन मरीनला लढावे लागले. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्या मरीनने तोफा डागून फॅक्टरीचे रक्षण केले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर शिवाजींनी जलदुर्ग बांधून ब्रिटिश, सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सागरी सत्तेवर दडपण आणले. खांदेरीवरून मराठा आरमाराला हुसकावून लावण्यात इंडियन मरीन व इतर अयशस्वी झाले. १६८३ मध्ये सुरत सोडून मुंबईत इंडियन मरीनचा तळ हलविण्यात आला व त्यास ‘बाँबे मरीन’ हे नवे नाव देण्यात आले. १६८६ ते १७३६ पर्यंत मराठा आरमार व बाँबे मरीन यांच्यात पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वासाठी सागरी लढाया चालू होत्या. ब्रिटिश शाही नौसेना, सिद्दी व पोर्तुगीज यांचे साहाय्य बाँबे मरीनला जर मिळाले नसते, तर मराठ्यांनी सरखेल आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वामित्व स्थापले असते व हिंदुस्थानच्या इतिहासाला कदाचित निराळे वळण लागले असते. १६८० ते १७०७ या काळात मराठ्यांना जमिनीवर मोगलांशी निर्वाणीचा लढा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. १७१६ च्या सुमारास बाँबे मरीनकडे २५ गुरब व गलबते होती. या नौकांवर एकूण ३८४ लहानमोठ्या तोफा होत्या. कमोडोर मॅथ्यूझ हा मरीनचा सरखेल होता. अठराव्या शतकात यूरोपात इंग्रज-फ्रेंच यांच्यामध्ये युद्धे चालू होती. त्यामुळे बाँबे मरीनची झपाट्याने प्रगती होत राहिली. १७३५ मध्ये मुंबईत हल्ली असलेल्या नाविक गोदीची बांधणी पुरी होऊन तेथे नौकाबांधणीस सुरुवात झाली. १७५० मध्ये सुकी गोदी तयार झाली. १७५१ मध्ये मरीनकडे ११ मोठ्या युद्धनौका, २५२ तोफा व पुष्कळ गलबते होती. १७४८ ते १७५६ च्या दरम्यान सरखेल संभाजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा धुव्वा उडविण्यासाठी ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले. आंग्रे यांचा वरचष्मा पेशव्यांना सहन होत नसे. नानासाहेब पेशव्याने जमिनीच्या बाजूने व बाँबे मरीनने सागरी मार्गाने धेरीया ऊर्फ सुवर्णदुर्गावर चढाई करून आंग्र्यांचा पराभव केला. या लढाईत ब्रिटिशांचे रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन हे अधिकारी होते. पेशव्यांनी अदूरदर्शीपणाने ब्रिटिशांना पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापण्यास आणि मराठा साम्राज्याचा ऱ्हास करण्यात मदत केली. १७६१ च्या सुमारास बाँबे मरीनला नाविक गणवेष देण्यात आला. त्यातील अधिकारी इंग्रज असत. नौसैनिकांपैकी ७५% सैनिक कोकणी असत. मराठा आरमाराचा निकाल लावल्यावर हैदर अलीची बंदरे बाँबे मरीनने जिंकली. एकोणिसाव्या शतकारंभी जावा, सुमात्रा यांवर हल्ले करण्यात मरीन यशस्वी झाले. १७९८ मध्ये मुंबई येथे मरीन बोर्ड स्थापण्यात आले. बोर्डाच्या आज्ञेप्रमाणे सागरी वाहतुकीचे संरक्षण, मुंबई बंदरात जलमार्ग दर्शन, सागरी सर्वेक्षण व जलालेखन इ. कामे मरीनला देण्यात आली. काठेवाड, सिंध, मकरान किनारा व इराणी आखाताचे जलालेखन मरीनने केले. १८२४ मध्ये मरीनने ब्रह्मदेशावरील आक्रमणात भाग घेतला. १८२९ साली लष्करी कायदा लागू करून ‘बाँबे मरीन’ ला ‘मरीन कोअर’ नाव देण्यात आले. अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांतीमुळे ब्रिटिशांना तेथील उत्तम प्रकारचे लाकूड मिळणे अशक्य झाले. जहाज बांधणीस मलबारी सागवान लाकूड उत्कृष्ट गणले जाते. परिणामतः मुंबई बंदरात जहाजबांधणीस चालना मिळाली. मुंबईच्या याट (खेळाच्या बोटींच्या) क्लबपाशी सुक्या गोदीत जहाजबांधणीसाठी तीन घसरमार्ग बांधण्यात आले. येथेच २,५९१ टनभाराची मिआनी युद्धनौका बांधण्यात आली. १८३० साली ‘मरीन कोअर’ हे नाव बदलून ‘इंडियन नेव्ही’ (हिंदी नौसेना) हे नाव देण्यात आले. २० मार्च १८३० रोजी मुंबई गोदीत बांधलेल्या व वाफेवर चालणाऱ्या ह्यू लिंडसे नौकेला समुद्रात सोडण्यात आले. शीडयुक्त जहाजांना समुद्रात ओढून नेऊन वाऱ्यात सोडण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा उपयोग होत असे. शिडाच्या जहाजांच्या अस्तास सुरुवात होऊन वाफेची जहाजे हिंदी नौसेनेत भरती होऊ लागली. नौकांचा टनभार (६००–७०० टनभार) वाढीस लागून सु. २०·३२ सेंमी. च्या (८ इंची) भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या. १८३९ मध्ये एडन बंदर ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केले. १८४३ च्या सुमारास हिंदुस्थानी नौसेनेत वाफेची ११ फ्रिगेट व इतर १५ युद्धनौका होत्या. १८४५ साली मुंबईपाशी बुचर बेटावर नाविक तोफखाना शाळा सुरू झाली. शीख-इंग्रज युद्धात नौसेनेत मुलतान मोहिमेत भाग घेतला. १८५२–५६ मध्ये ब्रह्मदेश व इराण-मोहिमांत कामगिरी केली. 

१८५७ च्या उठावात नौसैनिकांचा पायदळासारखा उपयोग झाला. एका हिंदी सैनिकाला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. उठावाचा विलक्षण परिणाम म्हणजे हिंदी नौसेनेचे विघटन होऊन मुंबई व कलकत्ता मरीन अशी दोन बिनलढाऊ नौकादले संघटित झाली. तारायंत्राच्या तारा समुद्रात सोडणे व जलालेखन करणे ही कामे त्यांस देण्यात आली. १८७७ मध्ये महाराणीचे ‘इंडियन मरीन’ उभारले गेले. हेदेखील बिनलढाऊच होते. काही पाणतीर नौका मरीनला मिळाल्या. ईजिप्त व ब्रह्मदेश यांवरील आक्रमणात मरीनने वाहतुकीचे काम सांभाळले. १८९० मध्ये मुंबईत एक पाणतीर गोदी बांधण्यात आली. १८९२ मध्ये इंडियन मरीन नाव जाऊन ‘शाही हिंदी मरीन’ हे नाव मिळाले. १८९६ ते १९०४ या काळात पूर्व आफ्रिकेत व बोअर युद्धात या मरीनने बिनलढाऊ कामे केली. पहिल्या महायुद्धात मरीनच्या बिनलढाऊ नौकांचे हत्यारी नौकात रूपांतर झाले. या युद्धाच्या अखेरीस ५०० ब्रिटिश अधिकारी व १३,००० सैनिक मरीनच्या सेवेत होते. १९१८ साली लढाऊ कारवाया करण्यास मरीनला समर्थ करावे व त्यासाठी मरीनला युद्धनौका पुरवाव्या अशी ब्रिटिश शाही नौसेनेच्या कार्यालयाला अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड जेलिकोने शिफारस केली; परंतु अ‍ॅड्‌मिरल मॉवबी याच्या नेमणुकीशिवाय दुसरी भरीव कामे पुढे ढकलण्यात आली. पुन्हा १९२५ मध्ये जनरल रॉलिन्सन, अ‍ॅड्‌मिरल सर रिचमंड व कॅप्टन हेडलम या तिघांच्या समितीने पुढीलप्रमाणे शिफारसी केल्या : मरीनऐवजी शाही हिंदी नौसेना नाव द्यावे. ४ स्लूप युद्धनौका, २ गस्ती, ४ ट्रॉलर, २ सर्वेक्षण व १ भांडार अशा १३ नौका नौसेनेत असाव्या इत्यादी. ११ नोव्हेंबर १९२८ रोजी शाही हिंदी नौसेना कार्यान्वित झाली. ध्वज ब्रिटिशांच्याच सेनेसारखा होता व त्यात एकही हिंदी अधिकारी नव्हता. सैनिक मात्र कोकणी व बंगाली होते. १९२८ साली केंद्रीय विधानसभेत हिंदी नौसेना-शिस्त कायदा विचारासाठी आला; पण तो एकमताने फेटाळला गेला. शेवटी ८ सप्टेंबर १९३४ रोजी कायदा संमत झाला व २ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईत हिंदी नौसेना कायदेशीरपणे प्रस्थापित झाली आणि २,००० वर्षांच्या भारतीय सागरी परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. १९३४ पासून आगामी यूरोपीय महायुद्धाची चाहूल लागली. अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड चॅटफील्ड याच्या नौसेनासुधारणा शिफारशी तत्काळ मंजूर झाल्या. नौसेनेच्या वाढीस व आधुनिकीकरणास गती मिळाली. अ‍ॅड्‌मिरल सर हरबर्ट फिट्‌सहरबर्ट हे नौसेनापती झाले. राखीव व स्वयंसेवक दले उभारण्यात आली. उमेदवारांकरिता नाविक प्रशिक्षणाची सोय झाली. १९४५ अखेर हिंदी नौसेनेत १५ युद्धनौका (स्लूप, फ्रिगेट व कॉर्व्हेट) आणि ४५७ इतर पूरक नौका, ३,०४४ नाविकाधिकारी व २७,४३४ नौसैनिक होते. मुंबई, कलकत्ता, विशाखापटनम्, कोचीन व मद्रास येथे मुख्य नाविक तळ होते. विविध प्रकारच्या नाविक प्रशिक्षणाच्या संस्था पुढील ठिकाणी होत्या. पाणबुडी विरोधी अधिकारीप्रशिक्षण व संदेश दळणवळण संस्था, मुंबई; तोफखाना, कराची; अभियांत्रिकी, ठाणे व तुर्भे आणि लोणावळा; प्रशिक्षणव्यवस्था, मुंबई व कराची; रडार, कराची. दुसऱ्या महायुद्धात हिंदी नौसेनेच्या पठाण, पार्वती व सिंधू या तीन युद्धनौका कामास आल्या. १९४१ मध्ये मुंबईहून प्रमुख नौसेना कार्यालय दिल्लीला हलविण्यात आले. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे नौसेनेने बंड पुकारले. युद्धानंतर नौसेनेत झालेली व होणारी सैनिककपात व भविष्यकाळाची काळजी ही बंडाची कारणे होती. हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाची छायाही बंडवाल्यांवर पडली होती. शेवटी राजकीय पुढाऱ्यांनी सैनिकांची मने वळविली.

माहिती साभार : मराठी विश्वकोश

Saturday, May 24, 2014

Shaniwarwada by William Carpenter

Shaniwarwada by William Carpenter

Dated between Jun - Dec 1850

http://collections.vam.ac.uk/item/O108183/gateway-to-the-shanwar-palace-painting-carpenter-william/


Wednesday, May 21, 2014

RIP M P Anil Kumar

During 9th or 10th STD, in my English textbook, I had a chapter titled, Airborne to Chairborne.

It was an autobiographical account of a fighter pilot, who due to a tragic injury, became paralysed below his neck.

It was the most emotional prose I had ever read, and made me realise how life can turn in a second. But after the tears have been shed, your heart starts to glow. It was his will to live on which makes you realise something. No matter how harshly life treats you; You owe it to yourself, you owe it to your parents who sacrificed for you, and you owe it to every friend who believed in you, to get back up and keep on fighting.

Yesterday Flying Officer M P Anil Kumar took off on his final sortie into the sunset. Forever.

RIP Sir.
And thank you for inspiring millions like me.