सफर जलदुर्ग पद्मगडची - सदानंद कबरे
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सिंधुदुर्गाचं महत्त्वाचं भौगोलिक स्थान शिवरायांनी ओळखलं होतं. त्यांनी सतराव्या शतकात मालवणच्या सागरतीरावर तीन जलदुर्गाची निर्मिती केली. ते जलदुर्ग म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होत. या तिन्ही जलदुर्गापैकी पद्मगड पाहण्यासाठी भटक्यांची गर्दी होते. पद्मगडाची भौगोलिक रचना खासच आहे. मालवणच्या समुद्रकिना-यावरून सिंधुदुर्गाकडे पाहिल्यास डावीकडे ‘पद्मगड’ तर उजव्या किना-याच्या भूशिरावर ‘राजकोट’ आहे. सर्जेकोट मालवण किना-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. समुद्राला ओहोटी आल्यावर सर्जेकोटापासून पद्मगडाला चालत जाता येतं.
पद्मगडाकडे जाताना किना-यावर दांडगेश्वराचं मंदिर लागतं. या मंदिराच्या समोर सिंधुदुर्गाकडे समुद्रात शिरलेली वाळूची पुळण दिसते. मागे आलेल्या त्सुनामीचा धक्का या मालवण समुद्रकिना-याला बसला होता. त्या वेळी सिंधुदुर्गाकडच्या मधल्या भागातील सर्व पूळणच वाहून गेली होती. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात खोलगट भाग तयार झाला होता. तेव्हा ओहोटीच्या वेळीसुद्धा पुरुषभरापेक्षा जादा उंचीचं पाणी भरायचं. त्या वेळी एखाद्या होडीनेच पद्मगडाकडे जावं लागायचं. गेल्या काही वर्षात पाणी पुन्हा साठल्यामुळे ओहोटीच्या वेळी कमरेएवढया पाण्यातून जावं लागायचं.
मालवणच्या धक्क्यापासून पद्मगडापर्यंत येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. रचिव दगडांनी पद्मगडाची तटबंदी उभारलेली आहे. याचा दरवाजा बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोरच आहे. किल्ल्याच्या लहानशा दरवाजातून आत गेल्यावर वेताळ मंदिर आहे. मालवणच्या कोळी बांधवांचं श्रद्धास्थान असल्याने त्यांची येथे नित्यनेमाने ये-जा चालू असते. त्यामुळे वेताळाची नियमित पूजाअर्चाही होते. पद्मगडाचा उपयोग शिवकाळामध्ये गलबतांच्या दुरुस्तीसाठी केला जायचा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधून या खडकाळ बेटावरील धक्क्यावर गलबतं आणली जायची. या गोदीत दुरुस्त झालेली अथवा नव्याने बांधलेली मध्यम आकारची गलबतं भरतीच्या वेळी बाहेर काढून सागरात दाखल व्हायची.
माहिती साभार : Prahaar
लिंक : http://prahaar.in/feature/
सदर छायाचित्र श्री संतोष पेडणेकर यांच्या ब्लॉग येथून घेण्यात आले आहे. तसेच या छायाचित्राचे सर्व हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत.
आपण त्यांच्या ब्लॉगला खालील लिंकद्वारे भेट देऊ शकता.
http://
No comments:
Post a Comment