Saturday, May 17, 2014

उपेक्षित जलदुर्ग

उपेक्षित जलदुर्ग
- अ‍ॅड. श्रीपाद भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता साडेतीनशे वर्ष उलटली आहेत. महाराजांच्या द्रष्टेपणाला मुजरा करण्यासाठी जलमार्गाने दुर्गभ्रमंतीचे आयोजन ‘सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण’ व ‘गिरिविराज हायकर्स’ यांच्या सहकार्याने केले होते.
खाडी मार्गाने प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती, तेव्हा थोडं कुतूहल आणि आनंद होत होता.
सकाळचे दहा वाजले होते, भरतीची वेळ झाली होती. लगबगीने आमचे आधुनिक मावळे गलबतावर आले.
शिडे उभारली गेली.
कल्याण-डोंबिवली खाडी मार्ग तसा उथळ असून ब-याच भागात खडक डोकावत असतात. हे खडक चुकवत आमचा प्रवास सुरू झाला.
डोंबिवलीच्या बंदरात दोन्ही बाजूला लाल, पिवळे झेंडे फडकत असलेल्या होड्या जणू आमचं स्वागतच करत होत्या. थोडं पुढे येताच पारसिकचा किल्ला व त्या मधोमध असलेल्या मुंब्रादेवीचं दर्शन झालं.
छत्रपती संभाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पारसिक किल्ल्याला खाडीतून पाहताना वेगळाच आनंद होत होता.
सोबतीला खाडी किना-यावरील गर्द झाडी होती. कॅमे-यातून हा निसर्ग टिपत आमचा प्रवास सुरू होता.
आता मात्र घाई करावी लागणार होती, कारण कळवा व ठाणे या खाडीत मोठा खडक होता. हा खडक पार करायचा असल्यास भरती चुकवून चालणार नव्हते. जर भरती चुकली तर पुन्हा सात-आठ तास भरतीची वाट बघावी लागणार होती.
खडकावरील चिंचोळ्या जागेतून वाट काढत होडी पुढे जात होती. तर होडीवर असणारा तांडेल खडक चुकवण्यासाठी प्रचंड खटपट करत होता. एवढ्यात दगडावर बोट आदळल्याचा आवाज झाला. सगळे एकदम स्तब्ध झालो. लागलीच बोटीचं इंजिन बंद करण्यात आलं.
अक्षरश: पंधरा मिनिटं होडीला काठीने पुढे ढकलण्यात आले.
तांडेलाने पाण्यात उतरून बोटीची स्थिती पाहिली, पण सुदैवाने काही मोडतोड झाली नव्हती. अखेर आम्ही वाशीच्या प्रशस्त खाडीत शिरलो. एका बाजूला पारसिकची डोंगररांग व दुस-या बाजूला उंच गगनचुंबी इमारती दिसत होत्या. खाडीत
रेती काढणा-या बार्ज रांगत होत्या. संध्याकाळचे चार वाजले होते. एलिफंटा बेटाला मागे सोडत आम्ही अरबी सागराच्या कुशीत झेपावत होतो. आता आम्हाला प्रचंड मोठी मालवाहू जहाजं दिसू लागली. गेट वे ऑफ इंडियाजवळ पर्यटकांना
फिरवणा-या होड्या दिसत होत्या.
समुद्रावरचं खारं वारं अंगाला झोंबत होतं. अंधार पडता-पडता खांदेरी-उंदेरी जवळ केलं. पण बराच अंधार झाल्यानं इथं न थांबता कोर्लई व रेवदंड्याच्या पायथ्याशी छोटय़ा खाडीत नांगर टाकायचा ठरवला.
रात्रीचे नऊ वाजले होते. खाडीत असणा-या खडकांचा अंदाज घेत गलबत खाडीत शिरत होते.
दिवसभराच्या थकव्यामुळे डोळे कधी मिटले ते कळलेच नाही. पहाटे बंदरातील होड्या मच्छीमारीसाठी सागराकडे निघाल्या असताना आमची कोर्लईचा पूर्व किनारा गाठण्याची लगबग सुरू झाली. पण खडक व चिखलातून पुढे सरकता येईना. शेवटी तिथल्या होडीला हाक देऊन त्या छोट्या पडावातून किनारा गाठला. गडाच्या पायथ्याशी मोठा कोळीवाडा आहे.
येथूनच गडावर जाणारी वाट आहे. गडाची उंची शंभर मीटर एवढी आहे.
किल्ला उभा राहण्यापूर्वी ही जागा ‘चौलचा खडक’ म्हणून ओळखली जायची. काही काळ मराठ्यांचा तोफा बनवण्याचा कारखाना याच किल्ल्यावर होता. आजही गडावर गंजलेल्या तोफा पाहायला मिळतात. तटा-बुरुजांमध्ये झाडेवेली वाढल्याने तटबंदी ढासळत असल्याचे दिसत होते.
हिंदवी आरमाराचे काही काळ असलेलं हे ठाणं पाहून आम्ही पद्मदुर्ग-जंजि-याच्या प्रवासाला निघालो. भूमार्गाने कोर्लई ते मुरुड अंतर साधारण सत्तावीस किमी आहे. सागरी प्रवासात मात्र भरती-ओहोटीचं भान राखणं महत्त्वाचं असतं.
अखेर दुपारी दोन वाजता दांडा-राजापुरी जेटी येथे पायउतार झालो. तिथे जमलेल्या कोळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून आम्ही सुवर्णदुर्गच्या दिशेने गलबत हाकारलं.
या टप्प्यात आम्हाला डॉल्फिनची सोबत होती. त्यांचे भरपूर फोटो काढता आले.
सुर्वणदुर्ग गाठल्यावर सामोरे आलेल्या राजेश लिंगायत यांची आम्हाला मोलाची मदत झाली. किल्ला आमच्या बरोबर स्वत: फिरायला आले. एकेकाळी स्वराज्यातील महत्त्वाचा आरमारी किल्ला असलेल्या या जलदुर्गात आता भरपूर रान माजले आहे. दुर्गप्रेमी वगळता इतरांकडून दुर्लक्षित अवस्थेतील हे जलदुर्ग आज उपेक्षित आहेत, याचीच खंत मनात घेऊनच जड पावलांनी परतीची वाट धरली.

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: 10 March, 2010
http://archive.prahaar.in/dil_se/21282.txt

No comments: